मोरगावचा महिमा

निजे भूस्वानंदे जडभरत भूम्यां परतरे ॥
तुरीयायास्तीरे परमसुखदे त्वं निवससि ॥
मयूराया नाथस्त्वमसि च मयूरेश भगवन् ॥
अतस्त्वां संध्याये शिव-हरि-रवि-ब्रह्म जनकम् ॥
॥ कऱ्हेचे तिरी एक असे मोरगांव ॥
॥ तिथे नांदतो मोरया देव राव ॥
॥ चला जाऊ यात्रेसी महापुण्य आहे ॥
॥ मनी इच्छिले मोरया देत आहे ॥
॥ स्वर्गे शंभुगृहे चैव पाताले शेषमंदिरे पृथिव्यां तु मयुरेशे ॥
मयूरपूर(मोरगाव) क्षेत्राचे वर्णन हे पौराणिक व ऐतिहासिक दृष्टीने फार आगळे वेगळे आहे. सर्वश्रुत गणेश वर्णनामध्ये गणेश हा शिव-पार्वतीचा पुत्र आहे. म्हणून अथर्वशीर्षामध्ये "शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमः" असे वर्णन आहे. श्रीमयूरेश्वर गणेश मात्र याला अपवाद आहे. कारण मुद्गल पुराणामध्ये वर्णन केल्या प्रमाणे "अतस्त्वां संध्याये शिव-हरि-रवि-ब्रह्म जनकम्". मोरगावचा श्रीमयूरेश्वर हा सर्वांचा जनक (पिता) आहे.
पृथ्वीवर गणेशाच्या ओंकाराची पहिल्यांदा ज्या ठिकाणी स्थापना केली ती जागा म्हणजे मयूरेश्वर क्षेत्र. या ओंकारापासून वेद निर्माण झाले. वेदांनी पंच देवांची निर्मिती केली. या पंच देवांनी ओंकाराची तपश्चर्या केली. त्यानंतर त्यांना ओंकारात्मक गणेशाचे दर्शन झाले. पंच देवांनी पृथ्वीवर गणेश मूर्तीची पहिल्यांदा स्थापना ज्या ठिकाणी केली ते क्षेत्र म्हणजे ज्येष्ठराज ब्रह्मणस्पती श्री मयूरेश्वर क्षेत्र होय.