सिध्दटेकचा महिमा

सिद्धटेक माहात्म्य

अष्टविनायकांपैकी सिद्धटेक हे एक प्रसिद्ध स्थान आहे. भगवान विष्णुंच्या तपश्चर्येने पावन झालेले असे हे एक पवित्र क्षेत्र आहे. या क्षेत्राला सिद्धटेक व येथील विनायकाला श्रीसिद्धिविनायक असे नाव का पडले याची कथा पुराणात आली आहे.

पूर्वी ब्रह्मदेव सृष्टीरचना करत असतांना मधु व कैटभ या पराक्रमी दैत्यांनी ब्रह्मदेवांच्या कार्यात विघ्ने आणून त्यांना भंडावून सोडले. त्या त्रासाला कंटाळून ब्रह्मदेव श्रीविष्णुंकडे आले. आणि त्यांनी या दैत्यांचा नाश करावा अशी प्रार्थना केली. भगवान विष्णू व मधु-कैटभ यांचे युद्ध झाले. पण श्रीविष्णुंना काही यश मिळाले नाही. ते मदतीसाठी शंकराकडे आले. आपल्या गायनाने त्यांनी भगवान्‌ शंकरांना प्रसन्न करून घेतले. शंकरानी वर मागण्यास सांगितले. तेव्हा विष्णुंनी मधु-कैटभाची सर्व कथा सांगितली. भगवान शंकर म्हणाले, श्रीविनायकाला प्रसन्न करून घेतले असतेस तर तुला यापूर्वीच जय मिळाला असता. नंतर विनायकाला प्रसन्न करून घेण्यासाठी भगवान शंकरांनी विष्णुला षडाक्षरी मंत्र दिला. या मंत्राच्या अनुष्ठानासाठी पवित्र क्षेत्र शोधीत विष्णू एका टेकडीवर आले. तिथे मंत्राचे अनुष्ठान करून विनायकांना प्रसन्न करून घेतले व इच्छित वर मिळविला. नंतर या टेकडीवर विष्णुंनी विनायकांचे देवालय बांधले व त्यात गंडकी शिळेची श्रीगजाननांची मूर्ती स्थापन केली. या स्थानावर विष्णुंना सिद्धी प्राप्त झाली म्हणून या क्षेत्राला सिद्धटेक असे म्हणतात. इथे श्री सिद्धिविनायकांच्या प्रदक्षिणा मार्गावर भगवान विष्णूंचे मंदिरही आहे.